Close

उकाडा कमी करणारा थंडावा कसा मिळवाल? (How To Get A Coolness That Reduces Heat?)

वाढता असह्य उन्हाळा, घामाच्या धारा नि थकलेलं शरीर ह्यामुळे जीव अगदी नको नकोसा होतो. परंतु आहाराकडे विशेष लक्ष दिल्यास आपला बराचसा त्रास दूर होईल.
वाढत्या तापमानाचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. उन्हाबरोबर शरीराचेही तापमान वाढते. अशा ह्या रणरणत्या वातावरणात शरीराला थंडावा देणे गरजेचे आहे. त्यासाठी काही खास टिप्स्.
उन्हाळ्यात पचनक्रियेचे कार्य मंदावते. त्यामुळे तेलकट, मसालेदार अन्नपदार्थांचे सेवन टाळा. अन् हलका आहार घ्या.
शक्यतो ताजे अन्न खा.
उन्हाळ्यात घाम जास्त येतो. त्यामुळे शरीरातली पाण्याची पातळी कमी होते. ती योग्य वेळेत भरून काढली नाही तर थकवा, अशक्तपणा जाणवेल. हे टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.
उन्हात जास्त वेळ बाहेर राहू नका.
चहा, कॉफीचे सेवन कमी करा. त्याच्या अधिक सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.
बाहेरचे अन्नपदार्थ तसेच हवाबंद पदार्थ खाणे टाळावे.
अधिक गरम आहार घेऊ नका.
शिल्लक राहिलेले अन्नपदार्थ झाकून फ्रिजमध्ये ठेवा.
अन्न दोन तासांपेक्षा अधिक काळ बाहेर राहिले तर ते खाऊ नका.
शरीराला थंडावा देणारे खाद्यपदार्थ
गर्मीच्या दिवसात वातावरण अतिशय आळसावलेले वाटते. थकवा, पोटदुखी, अ‍ॅसिडीटी यांसारखे आजार बळावतात. परंतु योग्य व संतुलित आहार घेतल्याने याचे प्रमाण बरेचसे कमी होते.
फळे खा. ज्यात पाण्याचा अंश अधिक आहे अशी फळे आवर्जून खा. त्यामुळे शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण राखले जाईल.
सकाळच्या नाश्त्यात दह्याचा समावेश करा.
पचण्यास हलक्या व भरपूर पोषण तत्त्वे असलेल्या भाज्या आहारात घ्या.
भात, बटाटा, चपाती, फळे, दूध, दही हे पिष्टमय पदार्थांचे स्त्रोत आहेत. यांच्या सेवनाने शरीरात साखरेचे योग्य प्रमाण राखले जाईल. अन् तुम्हाला उत्साही वाटेल.
शरीरात लोहाचे प्रमाण योग्य राखले जाईल याकडे विशेष लक्ष द्या. कारण लोहाची कमतरता असल्यास अधिक आळसावल्यासारखे वाटले.
मौसमी फळांसोबत केळी देखील अवश्य खा. केळ्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. त्यामुळे शरीरातील विषद्रव्ये घामावाटे बाहेर पडण्यास मदत होते.

शीतपेये
टरबुजाचा रस
उन्हाळ्यात शरीराला पाणी, मिनरल्स यांची आवश्यकता असते. याचा साठा टरबुजामध्ये भरपूर प्रमाणात असल्याने ह्याच्या सेवनाने फायदा होतो. तसेच वजन देखील वाढत नाही. त्याचबरोबर फॉस्फरस, लोह व बीटा केरॉटिन ही पोषकतत्त्वे असल्याने शरीर तंदुरुस्त राहते.
पपईचा ज्यूस
अपचनाचा त्रास असल्यास पपईचा ज्यूस अतिशय फायदेशीर ठरतो.
ताक आणि लस्सी
उन्हाळ्याच्या तडाख्यात कोल्ड ड्रिंक्स पिण्यापेक्षा ताक किंवा लस्सी पिणे अधिक चांगले. त्यामुळे पोटात थंडावा राहतो नि पोट भरल्यासारखे देखील वाटते.
ताक पचनास हलके असते. तसेच शरीरातील सोडियमची कमतरता भरून काढते.
जेवल्यानंतर ताक प्यायल्याने अन्नपचन चांगल्या प्रकारे होते.
ताक, लस्सी ताजे घेतल्यास उत्तम. बाजारातून ताक किंवा लस्सीचे पॅक आणत असाल तर त्यावरील एक्सपायरी डेट नक्की पाहा नि मग खरेदी करा.
लिंबू पाणी
उन्हाळ्यात अतिशय उपयुक्त पेय म्हणजे लिंबूपाणी.
शरीरातील पाण्याची कमी भरून निघते. थकवा दूर होऊन ताजेतवाने वाटते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अन् उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षण होते.
कैरीचे पन्हे
कैरीचे पन्हे चवीला अतिशय मस्त असते व शरीरात पाणी व मिठाचे संतुलन राखण्यासही मदत होते.
यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम व अ‍ॅन्टीऑक्सिडेंट असल्याने शरीराला थंडावा मिळतो.
जलजीरा
शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास व पचनक्रिया सुधारण्यास लाभदायक ठरते.
यातील लोह, व्हिटॅमिन यांसारखे तत्त्व शरीराला थंडावा देऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
बेलाचे सरबत
डिहाइड्रेशनपासून संरक्षण होते. बेलात फायबर मुबलक प्रमाणात असल्याने पचनक्रियेचे कार्य सुधारते.
बेरीज्चे सरबत
उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षण होते.
उन्हामुळे काळवंडलेली त्वचा उजळते. तसेच यातील अ‍ॅन्टीऑक्सिडेंट सुर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करतात.

नारळपाणी
उन्हाळ्यात नारळपाणी अतिशय उत्तम. शरीराला थंडावा मिळतो. याच्या योग्य सेवनाने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. कमजोर झालेली रोगप्रतिकारक शक्ती वाढीस लागण्यास मदत होते.
वाळ्याचे सरबत
शरीराला थंडावा देण्यासाठी वाळा अतिशय उपयुक्त आहे. साध्या पाण्यात वाळा घालून ठेवा व ते पाणी प्या. शरीराला थंडावा मिळतो. त्याचे सरबतही बाजारात उपलब्ध आहे.
फ्रिजचे पाणी पिण्याऐवजी माठातल्या पाण्यात वाळा घालून प्यायल्याने गर्मीच्या दिवसात अतिशय फायदेशीर ठरते.
टिप्स्
फळं कापल्यानंतर लगेच खा. खूप वेळ कापून ठेऊ नका. कारण फळे कापून ठेवल्याने त्यातील पाण्याचा अंश निघून जातो नि पोषणतत्त्वे देखील कमी होतात.
बाजारात मिळणारे पॅक बंद ज्युस शक्यतो पिऊ नयेत. त्यात संरक्षक (प्रिजरवेटिव्हज्) आणि साखरेचे प्रमाण अधिक असल्याने ते आरोग्यासाठी घातक ठरतात. फळांचे रस ताजे पिणे फायदेशीर ठरते. त्यात साखर न घालता पिणे उत्तम.

Share this article