Close

सुंदरसा पाहुणचार (Short Story: Sundersa Pahunchar)

  • प्रमोद कांदळगावकर
    अहो ते म्हणाले, “दत्ताचं लग्न ठरलं आहे. जावईबापूना घेऊन ये.”
    “केव्हाची तारीख धरली आहे मामांनी? तशी ती सर्वांच्या सोईची असेल नाही का? त्यांनी सुद्धा शासकीय सेवेत काम केलं आहे.” गावी जाण्यास मिळणार म्हणून बाईसाहेबांचा मूड चांगला होता.

    पत्नीच्या मामाच्या मुलाचं दत्ताचं लग्न ठरल्याचं लांबून कळलं होतं ! एके दिवशी मामाश्रीनी भाचीला दूरध्वनी केला.
    ”अगं छबी, दत्ताचं लग्न ठरलं आहे. तू जावईबापूना न चुकता भावाच्या लग्नास घेऊन ये.”
    गावी जाण्यास सरळ कारण प्राप्त झाल्याचा आनंद पत्नीच्या चेहर्‍यावर दिसत होता. रात्रीची जेवणं आटोपल्यावर ”अहो आज मामाचा सकाळी फोन आला होता. तुम्ही फार तर स्टेशनपर्यंत पोहोचला असाल.”
    ”मग काय म्हणतात तुमचे मामाश्री? अशी थट्टा मस्करी करीत असताना ”काही नाही, प्रथम विचारणा केली. कसे आहेत सर्वजण, आमचे जावई?”
    ”वा फार छान. माझी आस्थेवाईकपणे चौकशी केली हे ऐकून फार बरे वाटले. तसे तुझे मामा खास आहेतच.“
    ”अहो ते म्हणाले, दत्ताचं लग्न ठरलं आहे. जावईबापूना घेऊन ये.“
    ”केव्हाची तारीख धरली आहे मामांनी? तशी ती सर्वांच्या सोईची असेल नाही का? त्यांनी सुद्धा शासकीय सेवेत काम केलं आहे.“
    मध्येच विषय बदलत पत्नी म्हणाली, ”अहो मामा कुणाचे? माझे आहेत. त्यांच्या घरातील पहिलचं लग्न आहे आणि मामाची भावंडं, नातेवाईक “मुंबईस असल्याने गावी जाण्याची तिकिटे मिळावयास हवी.”
    मी खोचकपणे म्हणालो, ”अगं गाडीची तिकिटे नाही मिळाली तर जातील सर्वजण विमानाने. तुम्हाला प्रत्येक वेळी चेष्टामस्करी सुचते.
    तुझे मामा म्हणजे सामान्य व्यक्ती नाही, तालुकास्तरावरील आंबा बागायतदार.”
    “झालं तुमचं आता. कुठे आंबे आहेत? आंब्यांची बाग अलीकडे तो नाही करत, त्याला झेपत नाही. व्यापारास देऊन टाकतो.
    ”व्यापारातील बदलत्या वातावरणामुळे त्याला ते परवडत सुध्दा नाही.“
    ”तुला काय माहीत?“
    ”असे तो आईला सांगत असताना, ऐकलं मी.“

  • ”मग खरं असेलही“
    ”तुम्ही विसरलात परवाच तुमच्या टेबलावर ’रत्नागिरी टाइम्स’ पेपर होता. त्यात पहिल्या पानावर बातमी होती. देवगडचा आंबा बागायतदार संकटात.“
    मी म्हणालो,” माझ्या वाचनात आली नाही ती. “
    तेवढीच संधी घेत बाई बोलल्या. “मग दिवसभर काय वाचता त्या पेपरात?”
    “कधी कधी राहून जातं. राहिली असेल बातमी वाचण्याची.”
    आपली चूक झाल्याचे खुल्या मनाने कबूल करा.
    गावी जाण्यास मिळणार म्हणून बाईसाहेबांचा मूड चांगला होता. म्हणूनच मी विविध विषयांची चाचपणी घेण्याचा प्रयत्न केला खरा, त्या मूळ मुद्दा विसरल्या नव्हत्या.
    “दत्ताच्या लग्नाला जायचं आहे ना? तसे काय ते आत्ताच सांगा म्हणजे मला रजेचा अर्ज देता येईल आणि तुम्हाला तिकिटे काढणे सोईचे जाईल, नाही का?”
    बाईसाहेबांना ज्यावेळी फोन आला. त्यापासून त्यांचा उत्साह पाहता. मी मध्येच म्हणालो, “कोणत्या महिन्यातील तारीख मामानी पक्की केली? ते तरी सांगणे करा, म्हणजे पुढचे पुढे ठरवता येईल.”
    “कोणता महिना म्हणून काय विचारता. 25 डिसेंबरची तारीख पक्की करूनच आपल्या बंधूकरवी लग्नपत्रिका पाठवली आहे.”
    “मग हे कधी सांगणार ?“
    “मला बोलू द्याल तर ना ? माझ्या माणसांचा फोन आला, निरोप आला की, नेहमीच तुम्हाला मस्करी सुचते.”
    ”असे काही नाही, तुझी लगबग पाहून मला खूप आनंद होतो आणि तुझी थोडीशी मज्जा करावीशी वाटते. तू ज्यावेळी हिरमुसतेस त्यावेळी खूपच छान दिसतेस. ”
    “असो.,. काय ठरवलं?”
    “मी काहीही ठरवलं नाही. मी आजवर तुम्हाला सांगितल्याखेरीज काही ठरवते काय?”
    “तसे नाही पण रजेचे नियोजन? मुलांचा प्रश्न? ”
    “मुले आता मोठी झालीत. प्रणाली माझी समंजस आहे. म्हणजे ताई म्हटल्यावर सतेज पण राहिल हो, पण त्यांना विचारले का?”
    “तुम्हीच मुलांशी बोला. पिंकू माझी खरंच समंजस आहे. ”
    “तू जा गं दत्तामामाच्या लग्नाला, माझे क्लासेस आहेत? आणि सतेजची शाळा आणि त्यात चार पाच दिवसांचा प्रश्न. अशी गेलीस, परत आलीस.” असे लेकीने म्हणताच बाईसाहेब खुश होऊन चेहर्‍याकडे पाहू लागल्या.
    “खरंच माझी मुलं गुणी आहेत, समजदार आहेत.”
    तेवढ्यात पिंकू म्हणाली, “बाबा तसे तरी तुम्ही आईला बाहेर कुठे फिरावयास घेऊन जाता? ”
    “अगं पिंकू मला खूप आवड आहे पण तुझ्या आईला घर सोडवत नाही. त्याला मी तरी काय करणार ? जेव्हा, तेव्हा ती तुझं आणि सतेजचे नाव पुढे करते.“
    “मग आईचे बरोबर आहे. तिला सुद्धा आपली मुलं समोर दिसली पाहिजेत नाही तर तिला करमत नाही.”
    “मग काय पिंकू, आईचे गावी जाण्याचे तिकीट बुक करू ना?“ तेवढ्यात सतेज म्हणाला, “बाबा तुम्ही विमानाने गोवामार्गे जा.“
    “तुला काय सांगायला, बाबा म्हणे विमानाने जा. इथं मला घर चालवायचं असतं. महिनाभर घर खर्च सांभाळायचा असतो. ”
    “अगं हो, त्याला काय माहीत विमानाचे तिकीट महाग असते. ते त्याने म्हटलं म्हणजे आपण विमानाने गेलो का? तू असं करतेस. मुलांच्या भावभावनांचा विचार करत जा.”
    “तुम्ही प्रत्येक वेळी मुलांची बाजू घ्या. मला त्यांच्यासमोर एकटे पाडा म्हणजे तुम्ही चांगले मी मात्र मेली वाईट.”
    तू भलताच विषय भलतीकडे घेऊन जाते असे नाही का वाटतं?
    सतेज बाळा आज ना उद्या आपण जाऊ विमानाने, असे म्हणत. मुलांचा आनंद द्विगुणित करत, थेट साई ट्रॅव्हल्सचे ऑफिस गाठले. आम्ही नेहमीच साईचे वारकरी.
    “24 डिसेंबरची दोन देवगड तिकिटे मिळतील का?” बुकिंग क्लार्क ओळखीचा होता.
    “काय साहेब दत्ताच्या लग्नाला चाललात वाटतं?”
    “अरे तुला कसे माहीत?”
    “असे काय करता, तुम्ही जेव्हा, जेव्हा जाता येता, त्यावेळी दत्ता तुमची तिकिटे बुकिंग करतो. त्यामुळे तुमचं नाव आणि तुम्ही सुद्धा ओळखीचे झाले आहात…”
    तिथले काम उरकून कार्यालय गाठले. दरम्यान तिकिटे मिळाल्याचा आनंद मनोमनी चेहर्‍यावर दिसत होता. इतक्यात कार्यालयात प्रवेश करताच ’शरद म्हणाला, “साहेब आज फार खुशीत दिसताय.”
    “शरद कारण सुद्धा तसेच आहे. लवकरच पुन्हा गावी जायला मिळणार?”
    “साहेब आताच जाऊन आलात ना?”
    “मेव्हण्याचे लग्न ठरलं.”
    ”कधी?”
    ’25 डिसेंबर”
    “मग अद्याप वेळ आहे? म्हणजे एक महिना बाकी आहे ना?”
    ”हो पण कोकणातील गाड्यांची तिकिटे महिना, महिना बुक असतात.”
    ”मग ट्रॅव्हल्सने कशाला जाताय? कोकण रेल्वे आहे ना? ”
    “कणकवलीला उतरून पुन्हा देवगडला जाण्यापेक्षा ऑफिसचा दिवस भरून साईने जाणे सोईचे. सकाळी सहा वाजता मामाच्या घरी.”
    “साहेब तुमचं बरोबर आहे. आम्हाला काय तुमच्या कोकणातील प्रवासातलं कळणार? पण एकदा तुमच्या सोबत यायचं आहे.
    “जरूर पण माझं घर झाल्यावर जाऊ. असे म्हणून शरदचा निरोप घेतला.”
    तेवढ्यात बाईसाहेबांचा फोन आला. “अहो तिकिटे मिळाली का?
    ‘’सांगतो. ”
    “सांगतो नाही, तुमचं काय खरं नाही. सांगाल एक अन् जाल दुसरीकडे… मध्येच कुणी साठ्या गोपाळ भेटला की, मग बघायलाच नको.
    अगं तू सांगितल्यावर मी असे कधी केले आहे का?”
    “घरातून निघालो ते साई ट्रॅव्हल्सचं ऑफिस गाठलं. हे घे कार्ड, खरं वाटत नसेल तर सिद्धार्थला फोन कर.”
    “राहू दे. तिकिटे मिळाली ना?”
    “गो, ही घे.”
    “नको. तुम्हीच तुमच्याकडे ठेवून द्या. माझं काय कुठेतरी ठेवीन. आयत्यावेळी सापडली नाही तर मलाच मेलीला दोष देत बसाल.
    “अगं पिंकू सतेज आला का?”
    ‘’आलाय अभ्यास करतोय. आतल्या खोलीत त्यांना आताच सांगून आले, की बाबा आले की, एकत्र जेवण घेऊया. सर्वजण तुमचीच वाट पाहतायत.“
    “मग आता तुम्ही कसली वाट पाहता? जेवण वाढ एकदाचे. ”
    सर्वजण एकत्र जेवण घेत असतानाच, मग बाबा दत्ता मामाच्या “लग्नाला जायची तिकिटे मिळाली का? कोणत्या गाडीची? साई ट्रॅव्हल्सची माणसं तुम्हाला चांगलीच ओळखत असतील ना? हो ना? काही नाही. साई ट्रॅव्हल्सशिवाय गावी जात नाही म्हणून विचारले?
    असे काही नाही बाळा पण साईची सर्व्हिस खूप छान आणि गाडी लवकर पोचते. आजपर्यंत साई ट्रॅव्हल्समुळे कुठे अडकलो नाही.
    ठीक आहे, आईला सांभाळून घेऊन जा. असे दोन्ही मुलांनी सुरातसूर मिसळून सांगितले. तेव्हा कंठ दाटून आला.
    अरे बाळा आईला सांभाळून घेऊन जाईन आणि सांभाळून परत आणीन.
    आणि एकदाची दत्ताच्या लग्नाची तारीख जवळ येऊन ठेपली. आम्ही उभयता गाडी पकडावी म्हणून लवकर कार्यालयातून बाहेर पडलो. आदल्या दिवशी चार, पाच दिवसाच्या मुक्कामाकरिता लागणारे कपडे भरलेल्या बॅगा आमची वाट पाहत होत्या. लग्नघरात पै पाहुण्यांची वर्दळ होती. तरी सुद्धा मामाची लाडकी भाची येणार म्हणून वाट पाहत होता तो. त्याला कारण सुद्धा तसंच होतं. भाचीला पदोन्नती मिळाल्याने मामाश्री भलतेच खुश होते.
    ‘’अरे मामा, लग्नाची धावपळ असताना गाडी कशाला पाठविलीस? होत्या ना रिक्षा?”
    “पण जावई काय म्हणतील?”
    ”ते काही नाही म्हणणार ? ते याच गावचे. त्यांना तुझं सर्व काही माहीत आहे. तसा माझा नवरा समजूतदार आहे म्हणा. मग झाली का दत्ताच्या लग्नाची तयारी? ”
    ”तू काळजी करू नकोस. सर्व कार्यक्रम हॉलवर आयोजित केले आहेत. त्यामुळे तशी धावपळ नाही. तुम्ही तुमचं आटपून हॉलवर या.” असे बोलून मामा हॉलच्या दिशेने जाण्यास निघाले.
    मला मात्र दत्तासाठी कुणाची मुलगी ठरविली याची उत्सुकता लागून राहिली होती. लग्नपत्रिका मिळाल्यानंतर फारसा उलगडा झाला नव्हता म्हणूनच की, काय पुण्यवचन चालू असलेल्या व्यासपीठाच्या दिशेने वळलो.
    एवढ्यात दत्ताच्या सासूने स्मितहास्य केले. मला मात्र राहून राहून कुठंतरी त्यांना पाहिल्याचं वाटत होतं. एव्हाना वर्‍हाडी मंडळींनी हॉल भरून गेला होता. जो तो आपल्या पै पाहुण्यांशी गप्पात दंग झाला होता. लग्नाचा मुहूर्त जवळ येऊन ठेपला होता ! त्याक्षणी दत्ताचे सासूसासरे आतल्या खोलीत जाऊन बसले होते. ते मंगलाष्टक संपल्यावर कन्यादानासाठी बाहेर आले. पुन्हा एक वेळ खात्री पटते का? म्हणून जवळ गेलो. त्याक्षणी विषय संपला आणि दत्ताच्या सासूबाई व्यासपीठावरून खाली उतरल्या.
    मग मी धाडसाने विचारले. “अगं तू सुंदर जोशी ना?”
    “हो, तू मला ओळखलं?”
    “तुला काय वाटलं, दाढी वाढली म्हणून तुला ओळखू शकणार नाही? तू पुण्यवचन चालू असताना हॉलमध्ये आलास त्याचवेळी ओळखलं. मी नेहमीप्रमाणे हसले सुद्धा.”
    क्षणभरात मावशीच्या घरात भेटत असलेली सुंदर आठवली.
    इतक्यात सुंदरने मला प्रतिप्रश्न केला, “तू इथं कसा काय? सध्या असतोस कुठे? करतोस काय?”
    “मुंबईला असतो. इमानदारीत नोकरी करतो आणि हो, तुझा जावई तो माझा मेव्हणा लागतो.”
    “काय म्हणतोस? कसे काय?”
    “अगं, त्याचे वडील माझ्या पत्नीचे मामा लागतात. त्यांचा हा मुलगा.”
    “असं काय?”
    “या निमित्ताने इतक्या वर्षांनी आपण भेटतोय.”
    एवढ्यात सुंदरने खुणेने यजमानांना बोलून घेतलं. त्यांनीही सुंदरच्या स्वभावाचे गुणगान गायिले.
    मी तेवढ्याच ताकदीने बोललो, “आमची सुंदर आहेच तशी!”
    मला थांबवत सुंदर म्हणाली, “किती स्तुती करशील? किती दिवस देवगडमध्ये कणकवलीला?”
    तिच्याशी इतक्या दिवसांनी बोलत असताना तिची शाळेतील प्रतिकृती दिसत होती. साधी, सरळ स्वभावाची, जबाबदारीचे भान ठेऊन वागणारी, आईवडिलांच्या कामात झोकून काम करणारी, इतक्या वर्षांनी सुद्धा तिच्यात कुठे बदल झालेला दिसला नाही. याचं आश्चर्य वाटत होतं, अभिमानही.
    दत्ताची वरात घरी आली आणि मामा सासर्‍यांना म्हणालो की, “तुमच्या दत्ताची सासू माझी शालेय मैत्रीण आहे.”
    “काय म्हणता, जावईबापू.”
    “अहो, खरंच सांगतोय. ती शाळेत असताना माझ्या मावशीच्या शेजारी राहायला होती.”
    सुंदरच्या आठवणी मामाना सांगत असताना, आमच्या बाईसाहेब म्हणाल्या, “तुम्हाला कधी समजलं?”
    “हॉलवर पुण्यवचन चालू असतानाच!”
    “मला तिनं कणकवलीस घरी बोलविले आहे.”
    मला मात्र सुंदरच्या घरी जाणे शक्य झालं नाही, मध्ये मामाकडे जाणे होई! तिथेच अधून मधून भेट होत असे. मी प्रत्येक वेळी सांगत होतो तुझ्याकडे यायचं, तेव्हा ती म्हणाली, “तू काही सांगू नकोस. प्रत्येक वेळी आश्वासन देतोस, तुला आता आग्रह करणार नाही.”
    परवाच गणपतीच्या निमित्ताने अचानक मामाकडे भेट झाली, “त्यावेळी मी येतोय पत्नीसह. तुझ्याकडे राहण्यासाठी येतोय.” पण नेहमीप्रमाणे तिचा विश्वास बसला नाही. कसा बसणार होता विश्वास. आजवरचे अनुभव होते तिच्या गाठीशी.
    कणकवलीहून मुंबईस प्रयाण करायचं असल्याने कणकवली बसस्थानकात येताच सुंदरला भ्रमणध्वनी केला. लगबगीनं रिक्षा पकडली ’फणसवाडी स्टॉप’. जाऊन उतरतो तोच ’सुंदर’ आमच्या स्वागताकरिता हजर. मध्येच पुढं होत हास्यवदनाने तिने स्वागत केले. रिक्षा थांब्यापासून किमान दीड किलोमीटर चालत घरी पोहचलो. दुसर्‍या दिवशी मुंबईस निघायचं असल्याने परतीच्या प्रवासाचे सामान होतं. ती चाचपडत बोलत होती. आम्हाला पाहताच काहीशी गांगरलेली दिसली. तिच्या घराशेजारील परिसर निसर्गाने नटलेला होता. ते पाहून मी मनोमन भारावून गेलो.
    ती आत गेली. पिण्यासाठी पाणी आणलं. पाणी घेत असतानाच मी म्हटलं, “माझे मुंबईचे शेजारी मालवणला असतात. त्यांच्याकडे जाऊन येतो. मात्र रात्रीच्या जेवणाला तुझ्याकडे आहे.”
    “रात्रीचे जेवण काय करू?” तिच्या चेहर्‍यावरील ताण मला बरेच काही सांगून गेला.
    तेव्हढंच धाडसाने म्हणालो, “खास काही करत बसू नकोस. तू जी मीठ भाकरी खातेस तेच आमच्यासाठी कर.” असे विश्वासाने सांगितल्याने तिचा जीव भांड्यात पडला.
    रात्रीचे जेवण एकत्र घेत असताना सुंदरच्या आठवणी बाईसाहेबाना सांगत होतो. एवढ्यात लाईट्स गेल्या. त्या रात्री वादळ सुंदरच्या घराबाहेर घोंगावत होतं. त्यामुळे लाईट्स काढल्या होत्या. त्या सकाळपर्यंत आल्या नव्हत्या. माझी निघण्याची वेळ झाल्याने कणकवली रेल्वे स्थानकाकडे जाण्याकरिता रिक्षाची वाट पाहत मी बाहेर उभा होतो. सुंदर मात्र माहेर आणि सासरकडील प्रापंचिक स्थिती बाईसाहेबांना सांगण्यात गुंग होती. त्यामध्ये आठवणी सांगत असतानाच तिच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्याचे मी पाहिलं होतं. स्वतःला सावरत, आपली तीन मुलं चांगली आहेत. सुखी आहेत, पण धाकट्या मुलीचा मुलगा जन्मतःच अपंग असल्याची सल तिला बोचत होती. ती मध्येच थांबली आणि आत गेली. ओटी भरण्यासाठी तयार करून ठेवलेलं ताट घेऊन ती बाहेर आली. साडी चोळी देऊन तिनं ओटी भरली.
    बाईसाहेब म्हणाल्या, “ताई हे कशाला?”
    सुंदर म्हणाली,“तुम्ही प्रथमच आलात.”
    “हो पण ताई असा पाहुणचार कशाला?”
    तुमच्यासारख्या मोठ्या माणसांचे पाय माझ्या घरी लागल्याने मी खरोखरच मनोमन सुखावले असल्याचे सुंदर म्हणाली.
    बाईसाहेबांनी ताई मुंबईला आलात तर आमच्याकडे अवश्य या असे म्हटले. शेवटी सुंदरचा निरोप घेऊन रिक्षात बसलो. रिक्षाने कणकवली रेल्वे स्थानकाकडे कूच केली आणि सुंदरच्या आदरातिथ्याने आम्ही उभयते भारावून गेलो. ते पुन्हा येण्याच्या आमंत्रणासह.

Share this article