Close

प्रेग्नंसीच्या चर्चांवर अखेर ऐश्वर्याने सोडलं मौन (Aishwarya Sharma Dismisses Rumours Of Being Pregnant Says My Bp Dropped Down Drastically)

अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर अखेर तिने मौन सोडलं आहे. होळीच्या पार्टीदरम्यान ऐश्वर्याला भोवळ आली होती. त्यामुळे ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा होत्या. आता ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यावर उत्तर दिलं आहे.

‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा नुकत्याच एका होळी पार्टीत बेशुद्ध झाली होती. यानंतर तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं. ऐश्वर्या गरोदर असल्याने तिला पार्टीत भोवळ आल्याचं म्हटलं गेलं. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट्स करत ऐश्वर्या शर्मा आणि तिचा पती नील भट्टला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. आता खुद्द ऐश्वर्याने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित या चर्चांवर मौन सोडलं आहे. ऐश्वर्याने या पोस्टमध्ये चक्कर येण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

गरोदरपणाच्या चर्चांवर पोस्ट लिहित ऐश्वर्याने स्पष्ट केलं, ‘मी तिसऱ्यांदा ही गोष्ट मोठ्याने ओरडून सांगतेय. कारण मला सतत लोकांचे मेसेज येतायत आणि त्यांना सांगून मी वैतागले आहे. कृपया तुम्ही खोटे अंदाज वर्तवणं बंद करा. मी सर्वसामान्य माणूस आहे, त्यामुळे कधी-कधी माझा रक्तदाब कमी होऊ शकतो. तुमच्या माहितीकरता मी सांगू इच्छिते की माझा रक्तदाब 60-80 इतका खाली आला होता आणि त्यामुळेच मी बेशुद्ध झाले होते. मी गरोदर नाही.’

ऐश्वर्या शर्मा एका होळीच्या इव्हेंटदरम्यान डान्सचा सराव करताना बेशुद्ध झाली होती. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी नेण्यात आलं होतं. काही तास आराम केल्यानंतर ऐश्वर्या पुन्हा एकदा शूटिंगला आली होती. ऐश्वर्याने अभिनेता नील भट्टशी नोव्हेंबर 2021 मध्ये लग्न केलं. ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. या मालिकेत ऐश्वर्या खलनायकी भूमिकेत होती. म्हणून नीलसोबतच्या लग्नानंतर तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या दोघांनी ‘बिग बॉस 17’ या शोमध्येही एकत्र भाग घेतला होता.

ऐश्वर्या तिच्या भूतकाळातील रिलेशनशीपमुळेही चर्चेत आली होती. नील भट्टशी लग्न करण्यापूर्वी ती राहुल पंड्याला डेट करत होती. ऐश्वर्या आणि नील बिग बॉसच्या घरात असताना राहुलने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने ऐश्वर्यावर आरोप केले होते. नंतर ऐश्वर्या जेव्हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली, तेव्हा तिने राहुलच्या आरोपांना उत्तर दिलं होतं.

“माझं आणि राहुलचं ब्रेकअप २०१४ मध्येच झालं होतं. त्याचा ॲटिट्यूडच आमच्या ब्रेकअपचं कारण होतं. मी अभिनय क्षेत्रात काम करणं सोडून दिलं पाहिजे, असं तो मला म्हणायचा. मी का सोडू ॲक्टिंग? मी अभिनेत्री बनायला आली आहे तर साहजिकच मी अभिनय करेन. त्याने अजूनही बरंच काही म्हटलं होतं. ते मी इथे मुलाखतीत सांगूही शकत नाही. म्हणूनच मी त्याच्याशी ब्रेकअप केला होता. आमचं नातं त्याच वेळी संपुष्टात आलं होतं”, असं तिने स्पष्ट केलं होतं.

Share this article