Close

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पंतप्रधान म्हटल्यावर ट्रोल झालेल्या कंगनाने दिले स्पष्टीकरण ( Kangana Ranaut Explain Why She Called Netaji Subash Chandra Boss PM)

कंगना रणौत गेले काही दिवस राजकिय मुद्द्यावर सतत सक्रिय होती. शिवाय आता तिने राजकारणात प्रवेश केला आहे. तिची जन्मभूमी असलेल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून तिला तिकीट मिळाले आहे. निवडणूकांसाठी ती सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसते. अशाच एका कार्यक्रमात तिने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल वक्तव्य केले, त्यानंतर तिच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली. आता अभिनेत्रीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट शेअर करत या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.


कंगना रणौतने ५ एप्रिलला लिहिले की, 'जे मला भारताच्या पहिल्या पंतप्रधानांबद्दल ज्ञान देत आहेत त्यांनी हा स्क्रीनशॉट वाचावा. नवशिक्यांसाठी येथे सामान्य ज्ञान आहे. जे प्रतिभावान लोक मला अभ्यास करायला सांगत आहेत त्यांना हे माहित असावे की मी एमरजन्सी नावाचा चित्रपट लिहिला आहे. त्यात अभिनय आणि दिग्दर्शनही केले. त्याची कथा प्रामुख्याने नेहरू कुटुंबाभोवती फिरते. त्यामुळे कृपया दिशाभूल करू नये. जर मी तुमच्या IQ च्या पलीकडे बोलले तर तुम्हाला असे वाटू लागते की मला याबद्दल माहित नाही. त्यामुळे इथे तुमचीच वाईटरित्या फजिती झाली आहे.


कंगना रणौत लोकसभा निवडणुकीपूर्वी 'टाइम्स नाऊ'च्या कार्यक्रमात गेली होती. तिथे तिने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हटले होते, त्यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्रीवर जोरदार टीका झाली. लोकांनी तिची चेष्टा केली. तिच्या सामान्य ज्ञान आणि राजकीय क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले.


यानंतरच अभिनेत्रीने एनडीटीव्हीवरील एका बातमीच्या लेखाचा स्क्रीनशॉट पोस्ट केला. त्यात म्हटले आहे, '२१ ऑक्टोबर १९४३ रोजी स्वातंत्र्य सेनानी नेताजींनी सिंगापूरमध्ये आझाद हिंद (स्वतंत्र भारत) सरकारची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्धाच्या घोषणेच्या वेळी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतःला पंतप्रधान, राज्यप्रमुख आणि युद्धमंत्री घोषित केले होते.'

Share this article