Close

प्रेक्षकांची लाडकी जोडी पुन्हा एकत्र येणार! कोण होतीस तू काय झालीस तू मध्ये मंदार- गिरीजाच दिसणार ( Mandar Jadhav And Girija Prabhu Once Again Work Together In Kon Hotis Tu Kay Zalis Tu )

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता मंदार जाधव नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोण होतीस तू, काय झालीस तू या नव्याकोऱ्या मालिकेत मंदार यश धर्माधिकारी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मधील जयदीप-गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. महाराष्ट्राची ही लोकप्रिय जोडी या नव्या मालिकेतून कावेरी आणि यशच्या रुपात पुन्हा एकदा आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.
कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना मंदार म्हणाला, ‘स्टार प्रवाहसोबत काम करणं नेहमीच आनंददायी अनुभव असतो. श्री गुरुदेव दत्त, सुख म्हणजे नक्की काय असतं नंतर आता कोण होतीस तू, काय झालीस तू ही तिसरी मालिका स्टार प्रवाहसोबत करतोय.

आधीच्या दोन्ही भूमिकांपेक्षा वेगळी अशी ही व्यक्तिरेखा आहे. या मालिकेत मी यश धर्माधिकारी हे पात्र साकारतोय. दिसायला अतिशय देखणा, आपल्या लूक्सबद्लल सदैव जागृक असलेल्या यशला फॅशनची उत्तम जाण आहे. अनेक मुली यशच्या प्रेमात आहेत मात्र यशने आईला वचन दिलं आहे की तिच्या आवडीच्या मुलीशीच लग्न करेन. त्याचं त्याच्या कुटुंबावर आणि खास करुन त्याच्या आईवर प्रचंड प्रेम आहे. आई जे सांगेल त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. हे पात्र साकारताना खूप गोष्टी नव्याने शिकायला मिळत आहेत. मला खात्री आहे जे प्रेम प्रेक्षकांनी जयदीप या पात्राला दिलं तेच प्रेम यश या पात्रावर देखिल करतील. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका कोण होतीस तू, काय झालीस तू २८ एप्रिलपासून फक्त स्टार प्रवाहवर.’

Share this article