Close

काय सांगता? जय हो गाणं ए आर रहमानचं नाहीच! लोकप्रिय दिग्दर्शकाचा खळबळजनक दावा ( Oscar Winning Song Jai Ho Was Not Composed By A R Rahman Said Ram Gopal Verma)

ए आर रहमानने ज्या गाण्यासाठी ऑस्कर जिंकला ते गाणे खरे तर त्यांनी संगीतबद्ध केलेले नव्हते. गायक सुखविंदर सिंग यांनी ते बनवले होते. असा दावा दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केला आहे. या गाण्याशी संबंधित आणखी अनेक किस्से त्यांनी शेअर केले आहेत. एआर रहमान आणि सुभाष घई यांच्यातील भांडणाचे मूळ काय आहे हे देखील राम गोपाल वर्मा यांनी उघड केले.

'युवराज' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुभाष घई आणि एआर रहमान यांच्यात भांडण झाले होते, त्यानंतर रहमानने त्या चित्रपटासाठी तयार केलेले गाणे दुसऱ्या चित्रपट निर्मात्याला दिले. नंतर ए आर रहमानला त्या गाण्यासाठी ऑस्कर मिळाला. राम गोपाल वर्मा यांनी 'फिल्म कम्पेनियन'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, एआर रहमान 'युवराज' चित्रपटात संगीत दिग्दर्शक म्हणून काम करत होते. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई होते.

राम गोपाल वर्मा यांच्या म्हणण्यानुसार, सुभाष घई यांनी एआर रहमान यांना गाण्याचे संगीत तयार करण्यास सांगितले. मात्र रहमानला त्यांच्या इतर कामाच्या व्यस्ततेमुळे ते जमले नाही. जेव्हा गाणे तयार करण्यास उशीर झाला तेव्हा सुभाष घई संतापले आणि रागात एआर रहमानला खडसावले. लंडनहून परत आल्यानंतर सुखविंदर सिंह यांच्या स्टुडिओमध्ये भेटणार असल्याचे एआर रहमान यांनी सांगितले. ए आर रहमान लंडनमध्ये असताना त्यांनी गायक सुखविंदर सिंह यांना एक ट्यून तयार करण्यास सांगितली.

दिलेल्या वेळेनुसार सुभाष घई जेव्हा सुखविंदर सिंहच्या स्टुडिओत गेले तेव्हा ए.आर. रहमानच्या जागी सुखविंदर यांनी ती ट्युन केल्याचे घई यांच्या लक्षात आले. सुभाष घई यांनी विचारल्यावर सुखविंदरने सांगितले की, एआर रहमानने त्यांना गाण्याचे संगीत तयार करण्यास सांगितले होते. त्याचवेळी एआर रहमानही तेथे पोहोचला आणि सुखविंदरला विचारले की संगीत तयार आहे का? आणि मग त्यांनी सुभाष घई यांना संगीत दिले आणि त्यांचे मत विचारले.

राम गोपाल वर्माच्या म्हणण्यानुसार, सुभाष घई भडकले आणि ए.आर. रहमानला म्हणाले की, मी तुला करोडो रुपये फी देतो, तुला संगीत दिग्दर्शक बनवले आणि सुखविंदरने बनवलेले म्युझिक तू मला देतोस? माझ्यासमोर हे बोलायची हिम्मत आहे का? जर मला सुखविंदरला साइन करायची असेल तर मी त्यालाच करेन. पण माझे पैसे घेऊन सुखविंदरला माझ्या चित्रपटाची ट्यून तयार करायला लावणारा तू कोण आहेस.

राम गोपाल वर्मांनी पुढे सांगितले की, यावर एआर रहमानने सुभाष घई यांना उत्तर दिले होते की, तुम्ही माझ्या नावाचे पैसे देत आहात, माझ्या संगीतासाठी नाही. जर मी या गाण्याचे एंडोर्स करतोय तर ते माझे गाणे आहे म्हणजेच ते एआर रहमानचे संगीत आहे. मी 'ताल'चे संगीत कसे दिले हे तुम्हाला माहीत आहे का? ते माझ्या ड्रायव्हरने बनवले होते की आणखी कोणी.

या वादानंतर सुभाष घई यांनी ते गाणे 'युवराज'मध्ये ठेवले नाही नंतर एआर रहमानने ते गाणे 'स्लमडॉग मिलेनियर'मध्ये वापरले आणि ऑस्कर पुरस्कार जिंकला. २००८ साली प्रदर्शित झालेला 'युवराज' हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. पण चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली. यामध्ये सलमान खान आणि जरीन खान मुख्य भूमिकेत होते.

Share this article