Close

त्वरित ऊर्जा देणारी फळ (These Natural Food Give You Instant Energy)


थकवा जाणवत असेल आणि त्वरित ऊर्जा हवी असेल, तर इतर काय खावं, असा प्रश्‍न तुम्हालाही पडतो का?
दिवस संपता संपता आपल्या अंगातील त्राणच निघून गेले आहेत, असं वाटू लागतं. साधारण संध्याकाळचे पाच-सहा वाजले की, बहुतेकांना हा अनुभव येतो. आता काही तरी खायला हवं, याचेच संकेत जणू पोट देत असतं. मग अशा वेळी जिभेचं ऐकून चमचमीत काही तरी खाण्यापेक्षा, पोटाचं ऐकून काही तरी पौष्टिक खाण्यावर भर द्या. आता पौष्टिक खायचं ठरवलंच आहे, तर त्यासाठीचा उत्तम पर्याय म्हणजे फळं. त्यातही अशा वेळी त्वरित ऊर्जा देणारी फळं खाल्ल्यास शरीराची मरगळ निघून जाऊन लगेच ताजेतवानंही वाटेल. अशाच काही त्वरित ऊर्जा देणार्‍या फळांची ओळख करून घेऊ-

केळं
त्वरित ऊर्जा देणार्‍या फळांमध्ये केळं अग्रस्थानी आहे. महत्त्वाचं म्हणजे, केळं हे स्वस्त आणि बारमाही सहज उपलब्ध होणारं फळ आहे. त्यामुळे त्याचा आहारात समावेश करणं प्रत्येकालाच सहज शक्य होऊ शकतं.
शिवाय केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्सही मुबलक प्रमाणात असतात.

कलिंगड
कलिंगडाची फोड पाहिली की, मन ताजेतवानं होतं. असं हे कलिंगड खाल्लं की लगेच तरतरी येते. कलिंगडामध्ये क जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असतं. तसंच कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात असलेलं पाणीही शरीरासाठी उपयुक्त ठरतं.

सफरचंद
सफरचंद शरीराला हळुवार ऊर्जा पुरवतं. शिवाय सफरचंदामध्ये शरीराला तरतरी देणारी क आणि ब ही जीवनसत्त्वं, तसंच पोटॅशियमही मुबलक प्रमाणात असतं.

संत्री
संत्र्यामध्ये ऊर्जा आणि क जीवनसत्त्व यांचं भंडार असतं. तसंच शरीर क्रिया सुरळीत राहावी, यासाठी मदत करणारी फॉस्फरस, खनिजं आणि फायबर्सही संत्र्यामध्ये मुबलक प्रमाणात असतात.

पपई
पपई हे एक असं फळ आहे, जे आरोग्याच्या विविध पैलूंसाठी उपयुक्त ठरतं. पपईमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे घटक असतात. तसंच त्यामध्ये ऊर्जा उत्पन्न करणारे आणि शरीरातील दाह कमी करणारेही घटक असतात.

आंबा
फळांचा राजा आंबा पोषणमूल्यांच्या दृष्टीनेही फळांचा राजाच आहे. आंब्यामध्ये ब आणि क जीवनसत्त्वं, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, फॉलेट आणि प्रथिनं इत्यादी पोषणमूल्यं मुबलक प्रमाणात आहेत.

अ‍ॅव्हॅकॅडो
अ‍ॅव्हॅकॅडोमध्ये शरीरासाठी उपयुक्त असे फॅट्स मुबलक प्रमाणात असतात. तसंच यामध्ये ऊर्जा वाढवणारे घटकही आहेत.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, यापैकी एखादं फळ आपल्यासोबत बाळगणं सहज सोपं आहे. कधीही भूक लागली किंवा मरगळ जाणवली की, ते खायचं. म्हणजे शरीराला त्वरित ऊर्जेसोबतच आवश्यक पोषणमूल्यांचा डेली डोसही मिळेल.

Share this article